नाशिक ः जागतिक हवामान बदलाच्या फटक्यामध्ये हातावरच्या फोडासारख्या जपलेल्या द्राक्षांच्या निर्यातीवर आता कोरोनाच्या चिंतेचे ढग आले आहेत. कोरोना युरोपकडे सरकल्याने गेल्या चार आठवड्यांपासून जहाजामध्ये प्रवासात असलेल्या 650 कोटींच्या द्राक्षांचा त्यात समावेश आहे.
एवढेच नव्हे, तर आजपासून निर्यात खुली झाल्याने जवळपास दीडशे कंटेनरभर कांदा मुंबईच्या बंदराच्या प्रवेशद्वारावर पोचला असल्याने त्याच्या विक्री व्यवस्थेची चिंता निर्यातदारांना भेडसावू लागली आहे.
देशातून गेल्यावर्षी मार्चच्या मध्यापर्यंत 81 हजार 210 टन द्राक्षांची निर्यात झाली होती. यंदा आत्तापर्यंत 67 हजार 940 टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. त्यापैकी प्रवासात असलेली 45 हजार टन द्राक्षे विक्रीसाठी पोचायची आहेत. निर्यातीसाठी 80 ते 85 रुपये किलोचा भाव आणि पॅकिंग मटेरिअलसह वाहतूक असा एकूण एक किलो द्राक्षांचा भाव 146 रुपयांपर्यंत पोचला आहे.
युरोपामध्ये पाच किलोपर्यंतच्या द्राक्षांसाठीचा भाव 13 ते 14 युरोवरून 10 ते 11 युरोपर्यंत घसरला आहे. अशातच इटली, स्पेनमध्ये कोरोनाने थैमान घातले असताना इंग्लंड आणि जर्मनीमध्ये काळजी घेण्यास सुरुवात झाल्याने खरेदीसाठी ग्राहक सुपर मार्केटपर्यंत कसे पोचणार? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हे मुख्य कारण द्राक्षांच्या विक्री व्यवस्थेतील असल्याने उत्पादकांच्या काळजीचा घोर वाढला आहे.
श्रीलंकेतून कांदा मागणी थांबली
कांद्याची निर्यातबंदी आजपासून उठली असल्याने निर्यातदारांनी कांद्याचे जवळपास दीडशे कंटेनर मुंबईच्या बंदराच्या प्रवेशद्वारापर्यंत पोचवले आहेत. कांद्याच्या निर्यातीची तयारी गेल्या आठवड्यापासून सुरू असल्याने दोन ते तीन दिवसांपूर्वी निर्यातदारांना कंटेनर मिळणे मुश्कील झाले होते. आखाती देश, सिंगापूर, मलेशिया, हॉंगकॉंग, व्हिएतनाम, थायलंडसाठी हा कांदा जहाजाने येत्या दोन दिवसांमध्ये रवाना होईल, असे निर्यातदार विकास सिंह यांनी सांगितले. ते म्हणाले, की श्रीलंकेत सोमवारी ‘शट् डाउन जाहीर केल्याने कांद्याची मागणी थांबवण्यात आली आहे. श्रीलंकेला आठवड्याला दीडशे कंटेनर कांद्याची आवश्यकता भासते.
राज्यातील बागांमध्ये 30 टक्के द्राक्षांची काढणी व्हायची आहे. त्यातील 25 ते 30 हजार टन द्राक्षांची निर्यात अपेक्षित आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट निवळण्यासाठी होणाऱ्या उपाययोजनांकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. द्राक्षांमुळे प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होत असल्याने ग्राहकांकडून आरोग्यासाठी उपयुक्त द्राक्षे खरेदी केली जातील हा विश्वास कायम आहे.''
- विलास शिंदे (अध्यक्ष, सह्याद्री अॅग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.